Thursday, December 24, 2020

चला, व्यक्त होऊ या !

स्व. नारायण वासुदेव भालेराव अर्थात आमचे दादा 


मला लहानपणापासून ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडवलं, ज्यांच्यामुळे मी ब्लॉग लेखनाला सुरुवात करतोय त्या माझ्या वडिलांना स्व. बाळासाहेब भालेराव यांना मी माझा ब्लॉग अर्पण करतो. 

माझे वडील नारायणराव उपाख्य बाळासाहेब भालेराव ३४ वर्ष रेल्वेत गार्डची नोकरी करुन १९९१ साली सेवानिवृत्त झाले. रेल्वे गार्डची त्या काळातील नोकरी प्रचंड दगदगीची आणि अतिशय खडतर स्वरुपाची होती. रात्री अपरात्री उठून ड्युटीवर जावे लागायचे. जागरण तर नित्याचेच. त्यामूळे घरी आले कि पुरेशी विश्रांती आवश्यक असे. आधीचे २३ वर्षं मालगाडीचे गार्ड म्हणून काम केल्यानंतर मेल एक्सप्रेसवर त्यांना स्पेशल ए ग्रेड गार्डचे प्रमोशन मिळाले. धावपळीच्या नोकरीमुळे सामाजिक आणि सार्वजनिक संपर्कापासून  त्यांना अलिप्त राहावे लागत असे. पण माझ्या वडिलांचे अवांतर वाचन दांडगे होते. माझ्या लहानपणी आमच्याकडे पुणे येथून प्रकाशित होणारा तरुण भारत, साप्ताहिक सोबत, संघाचे मुखपत्र साप्ताहिक विवेक तसेच समाजवादी चळवळीतील मंडळींनी चालवलेले प्रभंजन मासिक नियमितपणे येत असे. कधी कधी कम्युनिस्ट विचारसरणीचे पत्रकार आर. के. करंजिया यांचे ब्लिटस् हे पाक्षिक सुध्दा वडील मुंबईहून आणत असत. सगळे अंक ते वेळ मिळेल तसे वाचून काढत. अनेक दिवस त्यांचे वाचायचे राहीलेले अंक, ते बाजूला थप्पी लावून ठेवत. आई म्हणायची, काय ही रद्दी ? पण त्यांचे वाचन झाल्याशिवाय त्या रद्दीची विल्हेवाट लावायची कुणाची प्राज्ञा नसे !

अनेक वेळा वडील, त्यांनी वाचलेल्या लेखांसंदर्भात  माझ्याशी बोलत. बोलत म्हणजे काय तर या लेखाचा विषय आणि आशय मला सोप्या भाषेत समजावून सांगत. मग तो अमेरीका - रशिया यांच्यातील वर्चस्ववादाचा, दिएगो गार्शिया बेटावरील लष्करी तळाच्या हालचालीचा असो किंवा भारतातील इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीवादी कारभाराचा असो ! ते त्यांच्या मनातील  विचार माझ्या समोर व्यक्त करीत. माझे प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. मला त्या वयात फार काही कळत होते असे नाही पण मी आमच्या घरी येणा-या सर्व प्रकारच्या विचारसरणीचे वृत्तपत्रे वाचावीत असा त्यांचा कटाक्ष असे. आमचे दादा पुष्कळ वेळा त्यांच्या मनातील विचार लिहून ठेवत. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील तसेच देशांतर्गत घडामोडीवर ते, त्यांना त्याबद्दल काय वाटतंय हे त्यांच्या वहीत लिहून ठेवत. त्यांच्या काळात व्यक्त होण्यासाठी आजच्यासारखे फेसबुक वगैरे माध्यमे नव्हती. त्यांनी कधीच कोणत्या वृत्तपत्रात, वाचकांच्या पत्रव्यवहारात वगैरे त्यांचे मनोगत, लेख छापायला दिले नाहीत. पण त्यांच्या मनातील प्रतिक्रिया आणि  विचार लिहून आपल्या भावना मोकळ्या करत, व्यक्त करत. 

खरंतर आपल्या पैकी अनेकांच्या मनात निरनिराळे विचार येत असतात. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात संवाद हरवत चालला आहे... समोरासमोर भेटणारी माणसं, प्रत्यक्ष न बोलता व्हाट्सअप आणि फेसबुकवर बोलण्यात धन्यता मानतात. मनातील भावना मोकळ्या केल्या नाहीत तर आतल्या आत धुमसत राहतात आणि मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि त्यातून कधी कधी चुकीचं आणि टोकाचं पाऊलही उचललं जातं. यासाठी व्यक्त होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे मूक साक्षीदार न होता त्यावर आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे व्यक्त व्हायला हवे. आपल्या राज्य घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून आपण आपले विचार सार्वजनिक व्यासपीठावर, समाजमाध्यमाद्वारे मांडले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आले आहे. त्यातूनच आजपासून मी ब्लाॅग लेखनाला सुरुवात करत आहे. राज्यशास्त्राचा अभ्यासक असल्याने सहाजिकच माझे लेखन राजकीय विषयांवर असेल. मात्र सामाजिक विषय सुध्दा मी लिहीणार आहे. वाचकांनी माझ्या ब्लाॅग लेखनावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवून मला प्रोत्साहीत करावे अशी आपुलकीची विनंती.

आपला, 

उदय नारायण भालेराव उर्फ बी उदयन

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...