Saturday, January 30, 2021

अयोध्या आंदोलनातील ते मंतरलेले दिवस ( भाग -२ )



अयोध्येतील १९८९ ची पहिली कारसेवा तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी दडपशाही करून हाणून पाडली असली तरी देशभर हिंदुत्वाचा हुंकार स्पष्ट पणे ऐकू येत होता.करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या  रामजन्मभूमी वरील  अत्याचाराचे प्रतिक असलेला बाबरी ढांचा पाहुन हिंदू मनामनात चिड उत्पन्न होत होती. त्याच दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला  जाहीर पाठिंबा देणा-या भारतीय जनता पार्टी ला अभुतपुर्व यश मिळून कल्याण सिंह मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. केंद्रात कांग्रेस चे नरसिंह राव सरकार कार्यरत होते. याच काळात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून झालेल्या विराट संत संमेलनात सरकार ला इशारा दिला गेला आणि अयोध्येत कारसेवेसाठी ६ डिसेंबर १९९२ ही तारीख मुक्रर करण्यात आली !

देशभर संत-महंत, साधू, ठिकठिकाणचे पिठाधिश्वर तसेच मठाधिपती यांनी सभा, प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करीत ६ डिसेंबर चलो अयोध्या हा नारा जनतेला दिला. विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्र जी, तसेच परीषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्व. अशोक जी सिंघल, डॉ . तोगडिया आदींनी देशभर झंझावाती दौरे काढून देशात रामभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. आता बाबरी मशिदीचे संरक्षण कसे करणार असा मुद्दा देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींनी उपस्थित  केला. बाबरी ढांचा चे संरक्षण करण्याचे  प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने घेतले,  तर कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत प्रवेश करुन शांततापूर्ण मार्गाने कारसेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने जाहीर केला.  

पुन्हा एकदा राम भक्तांच्या, कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी ६ डिसेंबर च्या कारसेवेसाठी देशाच्या सर्व भागांतून अयोध्येत कडे रवाना होउ लागल्या. जळगाव जिल्ह्यातून तसेच जळगाव शहरांतून गेल्या वेळच्या कारसेवेपेक्षा कितीतरी पटीने अधिक संख्येने कारसेवक अयोध्येला जाण्यासाठी निघाले. महिलांची संख्या ही लक्षणीय होती. या कारसेवे साठी  प्रवासात कुठेही अडवणूक न होता आम्ही ४  डिसेंबर रोजी थेट अयोध्येत पोहोचलो. अयोध्येतील वातावरण अभुतपुर्व होते. तेलगु, कन्नड,उडीया, गुजराती, आसामी, बंगाली आदी विविध भाषा बोलणारे कारसेवक जिकडे-तिकडे दृष्टोत्पत्तीस पडत होते. भाषा कोणतीही असली, पेहराव कोणताही असला तरी सर्वांच्या तोंडी एक शब्द मात्र समान होता.. जय श्री राम !                         

निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या कारसेवकां साठी शरयु नदीच्या काठावर विस्तिर्ण पटांगणावर मोठमोठे मांडव उभारण्यात आले होते.  शेजारी च भटारखाने. सर्व प्रकारचे अत्यंत बारीक सारीक नियोजन होते. सकाळी प्रात:विधी आटोपून झाले की चहापान त्या नंतर संघप्रार्थना. मग शरयु च्या थंडगार पाण्यात डुबकी लावून फ्रेश होऊन नास्ता उरकायचा. त्यानंतर त्या च ठिकाणी मान्यवर संत, साध्वी, यांच्या आवेशपूर्ण भाषणांना सुरुवात होत असे. वेळ मिळेल तसा आम्ही अयोध्येतील रस्त्यावर फेरफटका मारुन स्थानिक मंडळींशी बोलत होतो. त्यांच्या ही मनात कारसेवे बाबत कमालीची उत्सुकता जाणवत होती. अखेर ६ डिसेंबर ची सकाळ उजाडली ! तीन, तीन च्या रांगा करून रामाच्या जयघोषात शांतता पुर्ण कारसेवेसाठी आम्ही रामजन्मभूमी परीसराकडे कुच केले.             

लांबुनच विवादास्पद ढांचा  दिसू लागला. त्या ढांच्या च्या चारही बाजूंनी दुहेरी आणि मजबुत कंपाऊंड केले होते. सभोवताली मिलेटरी चे सशस्त्र जवान तसेच उत्तर प्रदेश चे हत्यारबंद पोलिस गराडा घालून होते. विवादास्पद ढांचा पासून अगदी समोर, सुमारे २०० मिटर अंतरावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर मा. लालकृष्ण अडवाणी, स्व अशोक जी सिंघल, डॉ. मुरली मनोहर जोशी, साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा तसेच संत-महंत विराजमान झाले होते. व्यासपीठासमोर काही लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. सकाळी १० चे सुमारास सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावरील वक्त्यांच्या ओजस्वी आणि स्फुल्लिंग चेतविणा-या भाषणांनी उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. प्रत्येक जण कारसेवेसाठी आतुर झाला होता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येत होता, कशी होणार कार सेवा ? 

तेव्हढ्यात विवादास्पद ढांचा च्या बाजूला काही तरी गडबड, हुल्लडबाजी सुरू झाली असल्याचे जाणवले. सगळेच जण उभे राहून तिकडे काय चाललंय ते पहाण्याचा प्रयत्न करू लागले. अन् काही क्षणातच ढांचा चे कंपाऊंड मोडून, सुरक्षा रक्षकांना न जुमानता  मोठा जमाव ढाच्या  वर तुटून पडल्या चे दृश्य दिसू लागले. बरेच कारसेवक ढाच्या वर चढून त्या इमारतीचे घुमट कुदळी ने तोडू लागले होते. पहाता पहाता सैन्य दल आणि पोलिस शांत पणाने , हताशपणे बाजूला उभे राहिले. लाखोंच्या संख्येने कारसेवक मिळेल ते हत्यार घेऊन ती इमारत पाडू लागले. व्यासपीठावरील नेते मंडळी व अन्य मान्यवर लाऊड स्पीकर वरून जमावाला शांततेचे आवाहन करीत होते. पण कारसेवे च्या ईर्षेने पेटलेला तो जमाव कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यातच आमच्या गृप ची सुध्दा पांगापांग झाली. मी आणि जळगाव चे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सुनील जंगले एकमेकांचा हात धरून त्या गर्दीत घुसलो. एक साधु बाबा त्यांच्या हातातील त्रिशूळ उलटा धरुन भिंत पाडण्याचा प्रयत्न करत होते.आम्ही त्यांच्या कडून थोड्या वेळासाठी त्यांचा त्रिशूळ मागून घेतला आणि समोर ची भिंत पाडण्यासाठी सरसावलो. जवळपास १५ मिनिटे आम्ही कारसेवा करीत होतो. 

सायंकाळचे ४.३० -५ वाजले होते. बाबरी ढांचा चे तिन्ही  घुमट तसेच ती संपूर्ण वास्तू जमिनदोस्त झाली होती. आम्ही सारे च आनंदाने आणि आश्चर्याने बेभान झालो होतो. जे घडले होते ते डोळ्यासमोर दिसत असुनही माझा माझ्याच डोळ्यां वर विश्वास बसत नव्हता ! अंधार पडता पडता आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो. दिवसभराच्या श्रमाने थकल्या मुळे रात्री जेवण होताच आम्ही गाढ झोपी गेलो. मध्यरात्री केव्हा तरी शिटी वाजली. व्यवस्थाप्रमुखांची उठा, चला.. तयार व्हा..आरोळी ऐकू न सगळे धडपडत उठलो. तेव्हढ्यात सुचना ऐकू आली., ' पुन्हा कारसेवेसाठी रामजन्मभूमी परीसराकडे कुच करायचे आहे'. त्या कडाक्याच्या थंडीत धावत पळत जन्मभूमी जवळ पोहोचलो. मोठ्या संख्येने उपस्थित कार सेवकांनी रामजन्मभूमी परीसराला घेराव घातला होता. त्या ठिकाणचा मलबा हटवून जागा सपाट केली. तात्पुरत्या स्वरूपात एक छोटे मंदिर उभारणी चे काम रातोरात  सुरू झाले.

जळगावचे  दीपक राव घाणेकर,  तत्कालीन जिल्हा संघचालक स्व.डाॅ. घाटे, मुकुंद मेटकर ,अन्य दोघे-तिघे व मी अशा आमच्या  जळगाव च्या गृप ने अर्धा तास विटा वाहण्यासाठी कारसेवा केली. सिमेंट- विटांचे छोटेखानी मंदिर उभारणी होताच त्यात पुन्हा रामलल्ला च्या मुर्ती विराजमान केल्या. त्यानंतर पहाटे पुन्हा आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो.सर्वत्र एकदम उत्साहाचे वातावरण होते. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. अयोध्या रेल्वे स्टेशन वर कारसेवकांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील मंडळी एकाच ट्रेन ने निघालो व मझल-दरमजल करीत सुमारे ४० तासांच्या प्रवासानंतर जळगाव स्टेशन वर उतरलो. 

अयोध्येतील कारसेवेसाठी काही कारणाने आमच्या सोबत येवु न शकलेले अनेक कार्यकर्ते, जेष्ठ स्वयंसेवक स्वागतासाठी स्टेशन वर आले होते.ही पण एक सुखद अनुभुती होती.  पुढचे काही दिवस देशातील अनेक भागात होते तसे तणावाचे वातावरण जळगाव जिल्ह्यात ही होते. पण अयोध्येतील ६ डिसेंबर च्या ऐतिहासिक कारसेवे मुळे देशभरातील हिंदू मनात  आत्मविश्वास निर्माण झाला हे मात्र निश्चित. बाबरी ढांचा उध्वस्त झाल्या ने  एक कलंक मिटला ही भावना जनमानसात प्रबळ झाली. 

१९९२ साली अयोध्येतील श्रीरामजन्मभुमी वरील वादग्रस्त ढांचा उध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर सुध्दा न्यायालयात हा विषय प्रलंबित होता.   २०१९ मध्ये  या देशातील सर्वोच्च न्यायालयाने,  "ती " जागा रामजन्मभूमी च असल्याचा  ऐतिहासिक निर्णय दिल्याने मंदिर उभारणी चा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या ५ आॅगस्ट ला अयोध्येत प्रस्तावित मंदिराचे भूमिपूजन संपन्न होऊन आता मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाचे काम देशभर सुरू झाले आहे. 

अयोध्या आंदोलनाला त्या  वेळी  विरोध करणारे तसेच त्या आंदोलना पासून स्वतः ला जाणीवपूर्वक  अलिप्त  ठेवणारे आता राममंदिरासाठी  निधी संकलनात पुढे आहेत, हा हिंदूत्वा चा प्रभाव आहे.  दोन्ही वेळा झालेली कारसेवा घरात -मातोश्रींच्या कुशीत सुखेनैव बसून टीव्ही वर गंमत म्हणून पहाणारे आता अयोध्येचे दौरे करताहेत.  त्या वेळी या आंदोलनाला आर्थिक मदत मागायला आम्ही गेलो असता, नाकं मुरडणारी मंडळी आता मात्र लाखांच्या अन् कोटींच्या देणग्या देतात हे पाहीले कि हसू येते ! कालाय तस्मै नमः !! ही तर प्रभू श्रीरामचंद्राची लीला !!! अयोध्या आंदोलनात सहभागी होण्याचे, प्रत्यक्ष कारसेवा करण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष  मंदिर उभारणी च्या कार्यात किमान काही तास तरी द्यावेत अशी मनस्वी इच्छा आहे. बघुया कधी योग येतो ते !                                           

जय श्रीराम.

Tuesday, January 26, 2021

अयोध्या आंदोलनातील ते मंतरलेले दिवस ( भाग -१ )


सन १९८६ ! मी त्या वेळी विश्व हिंदू परिषदेच्या कामात होतो. पाचोरा येथे विश्व हिंदू परिषदेची जळगाव जिल्हा बैठक सुरु असतानाच फैजाबादच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने अयोध्या येथील वादग्रस्त जागेतील रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप उघडण्याचा व रोजची पुजा करण्यास परवानगीचा निकाल दिला असल्याचे वृत्त येऊन थडकले... आणि त्या बैठकीत एकदम उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन जिल्हा संघटक डॉ. खटावकर यांनी बैठकीत याबाबतची सविस्तर माहिती आम्हा उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. पाचो-याचे जेष्ठ कार्यकर्ते स्व. कमळे गुरुजी यांनी पेढे वाटून आमचा सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला. पण अजून मोठा पल्ला गाठायचा बाकी होताच. अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचा जन्म झाला, ती आमच्या श्रध्दास्थानाची जागा परकिय आक्रमक बाबराने बळजबरीने बळकावून उध्वस्त करुन त्याचे रुपांतर मशिदीत केल्याचे शल्य शेकडो वर्षे हिंदुंच्या मनात सलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने १९८९ पासून देशभर अयोध्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्या वर्षी प्रथमच दस-याला होणारे स्वयंसेवकांचे संचलन रद्द करुन प्रत्येक गावातून श्रीराम प्रतिमांच्या  मोठमोठ्या शोभायात्रांचे आयोजन केले होते. जळगावात सुध्दा भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जुन्या गावातील श्रीराम मंदिरात भाजपचे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते तत्कालीन खासदार स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या हस्ते पुजा व महाआरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. थकलेले असुनही  नानासाहेब पायीच मिरवणुकीत सहभागी झाले होते. नागरीकांच्या उत्साहाला उधाण आले होते.  मिरवणुकांमध्ये सकल हिंदू समाज पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्येने सहभागी झाल्याचे दृश्य सर्वत्र पहायला मिळाले. या शिवाय राम पादुका पूजन, रामशीला पुजन, रामज्योत दिवाळी आदी उपक्रमांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत होता.  


याच दरम्यान जिल्हा स्तरावर तसेच मोठ्या शहरात श्रीराम कारसेवा समिती स्थापन करण्यात आल्या. जळगाव महानगर कारसेवा समितीचे अध्यक्ष पदावर जेष्ठ विधिज्ञ स्व. अच्युतराव अत्रे यांची निवड करण्यात आली तर समितीचा संयोजक म्हणून माझ्याकडे दायीत्व होते. रामजन्मभूमी विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभर सुरू झाले होते. १९८९च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर प्रश्नासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रामरथ यात्रा सुरू केली. अडवाणीजींच्या या देशव्यापी रथयात्रेने देशभर वातावरण ढवळून निघाले. जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी बैठका, मिरवणूका, जाहीर सभा यातून ३० आक्टोबर चलो अयोध्या हा जयघोष दुमदुमत  होता. प्रत्येक गावातून ३० आक्टोबरच्या कारसेवेसाठी अयोध्येला जाण्यासाठी कारसेवकांचे जथ्थे तयार होऊ लागले होते. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत कारसेवा होऊ देणार नाही आणि तथाकथित बाबरी मशिदीचे संरक्षण करणारच असा चंग बांधला होता. आडवाणीजींची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी समस्तिपुर येथे अडवली व अडवानी प्रभुतींना तेथेच अटक केली. देशभरातून मोठ्या संख्येने कारसेवक मिळेल त्या रेल्वेने अयोध्येकडे निघाले. उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाड्या अडवून पोलिस बळजबरीने कार सेवकांना उतरवून अटक करीत. परंतु बरेच कार्यकर्ते पोलिसांचा डोळा चुकवून शिताफीने निसटले आणि अलाहाबाद, लखनो पर्यंत पोहोचलेच ! 

८९ सालच्या पहिल्या कारसेवेसाठी जळगावातून सुमारे २०० कारसेवक दोन - तीन तुकड्या करुन निघाले होते. त्यापैकी आमचा ३५ जणांचा ग्रुप अलाहाबाद येथून अयोध्येकडे  थेट रस्त्याने न जाता आडवाटेने, शेताच्या बांधावरून पायवाटेने निघालो. हेतू हा की पोलिसांच्या दृष्टीस पडू नये. सतत ३ दिवस आम्ही चालत होतो. वाटेत अनेक खेडेगावात आमची दुपारच्या जेवणाची तसेच कडाक्याच्या थंडीत सुध्दा रात्रीच्या जेवण-मुक्कामाची सोय ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांनी मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने केली. आम्ही अयोध्ये पासून केवळ १०/१२ किमी अंतरावर असतानाच शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक करुन एका शाळेत - तात्पुरत्या तुरूंगात डांबले. आम्ही अयोध्येत पोहोचू शकलो नाही तरी पण लपतछपत अयोध्येत पोहचलेल्या अन्य ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेपर्यंत जावून कारसेवेचा प्रयत्न केला त्या वेळी झालेल्या गोळीबारात काही कारसेवक शहीद झाले आणि शरयुचे पाणी लाल झाले ! अशा रीतीने १९८९ ची पहिली कारसेवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी हाणून पाडली. मात्र तरीही संपूर्ण देशभरातील हिंदूत्व या आंदोलनाच्या निमित्ताने जागृत झाले ही मोठीच उपलब्धती मानली जाते. 

अनेक साधू-संत महंत, मठाधिपती ही मंडळी विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत राममंदिर आंदोलनात सहभागी झाले. देशभरातून जात, पंथ -उपपंथ, भाषा, प्रांतभेद, गरीब श्रीमंत असा कोणताही अभिनिवेश न बाळगता केवळ रामभक्त आणि हिंदू या भावनेतून लाखो लोक भगव्या ध्वजाखाली एकत्र आले हे या आंदोलनाला मिळालेले मोठे यश म्हणावे लागेल. (क्रमश:)

बी. उदयन 

Monday, January 4, 2021

निमित्त - अॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारण प्रवेशाच्या बातमीचे...



राजकारण हा बदमाश लोकांचा प्रांत आहे, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण प्रचलित आहे. अर्थात ही म्हण सदा सर्वकाळ, सर्वच राजकारण्यांना सरसकटपणे लागू होणारी आहे असे मला वाटत नाही. स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असे या म्हणीचे स्वरूप असावे असे मी मानतो. आपापल्या क्षेत्रात कर्तबगार असणा-या सत्प्रवृत्त आणि प्रामाणिक माणसांनी राजकीय क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा नेहमी व्यक्त केली जाते. पण आज राजकीय क्षेत्र इतके बरबटलेले आहे की अशी चांगली माणसे राजकारणाच्या वाटेला अजिबात फिरकत सुद्धा नाही. नैतिकता आणि सचोटी  या शब्दांचा राजकारणाशी दुर दुरपर्यंत संबंध नाही अशी सार्वत्रिक अवस्था आहे. या उलट राजकारण आणि भ्रष्टाचार हे दोन समानार्थी शब्द आहेत अशीच भावना सर्वसामान्य जनतेत आहे आणि ही गोष्ट आपल्या कडच्या काही भ्रष्ट आणि अप्रामाणिक राजकारण्यांनी स्व-कर्तुत्वाने सिध्द केली असल्याचे ब-याचदा दिसून येते.

या संदर्भात कुणाकडे अंगुलीनिर्देश करण्याचे किंवा कुणाचे नाव घेण्याची आवश्यकता नाही.  मात्र असे असले तरी  राजकीय क्षेत्रातील या चिखलात सुध्दा काही ठिकाणी सदाचाराचे आणि सात्विकतेचे कमळ उमललेले पहायला मिळते. राजकारणाच्या भांगेत सुध्दा कुठे कुठे नैतिकतेची तुळस उगवलेली दृष्टोत्पत्तीस पडते आणि कुठे तरी आशेचा किरण आहे हे जाणवते. स्व. अटलबिहारी वाजपेयी हे अलिकडच्या काळातील, राजकारणातील स्वच्छ चारित्र्याचे ठसठशीत उदाहरण सांगता येईल. अटलजींच्या आचरणासारखी असंख्य माणसे आपल्या अवतीभवती आहेत पण ही मंडळी राजकारणाच्या वा-यालाही फिरकत नाहीत.

देशात आज डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सनदी लेखापाल, शिक्षक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, साहित्यिक, उद्योजक, शेतकरी, पत्रकार, खेळाडू, चित्रपट कलावंत, प्रशासनातील निवृत्त अधिकारी आदी अनेक क्षेत्रांत स्व-कर्तृत्वाने मोठी असणारी मंडळी कार्यरत आहेत. यातली भिन्न भिन्न राजकीय विचारसरणी असणारी काही मंडळी जरी राजकीय क्षेत्रात सहभागी झाली तरी आजच्या राजकारणाचा पोत बदलायला निश्चितच मदत होईल असा विश्वास कुणी बाळगला तर त्यात चुकीचे काय ?  

या सगळ्या गोष्टी आत्ता आठवायचे कारण म्हणजे काल परवाच जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाचे वृत्त एका दैनिकात  प्रसिद्ध झाले आहे !  अर्थात निकम साहेबांच्या राजकारण प्रवेशाचे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील चर्चा या आधीही गेल्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरू झाली होती.

लोकसभा निवडणुक लढवण्यासंदर्भात त्यांना काही राजकीय नेत्यांनी शब्द टाकला असल्याचे त्यांनी मोकळेपणाने कबूल केले आहे.  अॅड. उज्ज्वल निकम साहेब त्यांच्या कार्यक्षेत्रात स्व-कर्तृत्वाने मोठं झालेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. एक वकील म्हणून आपले बुद्धीकौशल्य पणाला लावून, प्रसंगी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून या देशासाठी आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने अलीकडेच  त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. निकम साहेबांनी राजकीय क्षेत्रात सहभागी जरूर व्हावे. पण त्यांनी कुठलीही निवडणूक लढवू नये असे मला नेहमीच वाटते. मध्यंतरी त्यांच्या लोकप्रियतेचा आणि  ईलेक्टीव्ह मेरीटचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी काही मंडळींनी, निकम साहेबांनी लोकसभा निवडणुक लढवावी असा घाट घातला होता. तशी चर्चा माध्यमातून सुरू झाली होती. त्यावेळी देखील मी अॅड. उज्ज्वल निकम यांना सोशल मीडियातुन जाहीर पत्र लिहून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये असा अनाहूत सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी आणि आज सुध्दा माझे असे ठाम मत आहे की, अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखा देशभक्त आणि निष्णात कायदे पंडित देशाच्या संसदेत असलाच पाहिजे, पण दारोदार मतांचा जोगवा मागत फिरत, आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात लोकसभा निवडणुक लढवून संसदेत जाण्यापेक्षा राजकीय पक्षांनी किंवा मा. राष्ट्रपती महोदयांनी निकम साहेबांना सन्मानाने राज्यसभेत खासदार म्हणून स्थानापन्न करावे हेच योग्य राहील असे मला वाटते. आमच्या सार्वभौम आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या भारत मातेला उध्वस्त करु पहाणा-या राष्ट्रद्रोही आरोपींना, न्यायालयात शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणा-या कायदेपंडितांना जर संसदेचे सदस्यत्व मिळू शकते तर त्याच देशद्रोहयांवरील आरोप  आपल्या  बुद्धी-कौशल्याने न्यायालयात सिद्ध करून त्यांना फासावर लटकवण्यासाठी पराकाष्ठा करणारे निकम साहेब संसदेत का नकोत ? अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखे व्यक्तीमत्व  संसदेत असण्याने  संसदेचीच प्रतिष्ठा वाढेल. तशी  संधी मिळाली तर  संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे - राज्यसभेचे खासदार म्हणून या राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी ऐड. उज्वल निकम साहेब निश्चितपणे प्रयत्नशील राहतील हे मात्र नक्की.

तुर्तास अॅड. निकम साहेबांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाला आपण शुभेच्छा देऊ या !

बी. उदयन, जळगाव.

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...