Tuesday, December 27, 2022

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्हणजे काय हे समजण्याचे खरं म्हणजे त्या वेळी माझं वय नव्हतं ! मी केवळ १२ वर्षां चा होतो ! 


इतकेच लक्षात आले होते की, देशातील अनेक मोठ्या नेत्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले आहे, संघावर बंदी घातली आहे आणि मुख्य म्हणजे आपली संघाची अभिमन्यू सायं शाखा बंद पडली आहे. संघ शाखेत जाऊन भगवा ध्वज लावला तर पोलिस पकडतात म्हणे... 

संघ शाखेत जाणा-या बळीराम पेठेतील बहुतेक घरांमधील मोठ्या माणसांना पोलिसांनी अटक करून धुळे, नासिक, पुणे येथील तुरुंगात ठेवले होते. घरी नियमितपणे येणाऱ्या सा. विवेक आणि पुणे तरुण भारत मध्ये ही सेन्सॉरशिप मुळे या बातम्या प्रसिद्ध होत नव्हत्या. देशभरात दडपशाही सुरू होती. या सगळ्या गोष्टींची मनातल्या मनात चिड येत होती.  

तशातच राजू साठे ने निरोप आणला... आपल्या अभिमन्यू सायं शाखेतील मुलांनी भिंतीवर घोषणा लिहायच्या आहेत. आपण लहान मुले असल्याने पोलिस आपल्या ला पकडणार नाही, फार तर फार दोन रट्टे मारतील आणि आरडाओरडा करून हाकलून देतील. आमच्या शाखेचे मुख्य शिक्षक श्री. घन:श्याम जोशी यांच्या निरोपा नुसार आम्ही - मी, राजू ( रघुपती ) साठे, सुनील कुलकर्णी व त्याचा धाकटा भाऊ चारुदत्त कुळकर्णी अशा चौघांनी खडू, गेरू, कोळसा यांचा उपयोग करून भिंतीवर घोषणा लिहायच्या असे ठरले !

कोणत्या घोषणा लिहायच्या ? तर - आणिबाणी रद्द करा, मीसा बंदी मुक्त करा, संघावरील बंदी उठवा, भारत माता की जय !

कुणी ही घरी सांगायचे नाही आणि उद्या ३० डिसेंबर ला रात्री ८ ते १० या वेळात काम फत्ते करायचे असे आम्ही आदल्या दिवशी म्हणजे २९ ला ठरवले. 

३० तारीख उजाडली आणि कुलकर्णी बंधुंचे आजोबा वारल्या मुळे त्या दोघे जणांना आई- वडीलांसोबत तातडीने बाहेर गावी जावे लागले.

पण साठे आणि माझा निर्णय पक्का झाला होता.

३० डिसेंबर ला रात्री ९ च्या सुमारास आम्ही दोघेच कडाक्याच्या थंडीत खाकी चड्डी च्या खिशात खडू, कोळसा आणि गेरु चे खडे घेऊन मोहिमेवर निघालो.

त्या काळात डिसेंबर च्या थंडीत रात्री ९ वाजता सामसूम होत असे. रस्त्यावर अजिबात वर्दळ नसलेल्या बळीराम पेठेत आम्ही दोघेच ठरलेला मजकूर भिंतीवर लिहीत या गल्लीतून पुढच्या गल्लीत जात होतो. 

अंधारात आपल्या ला कुणी ही पहात नाही या समजुतीत आम्ही निर्धास्त होतो. पण... पण.. का कुणास ठाऊक कुणी तरी आपल्या मागावर आहे अशी शंका यायला लागली !

एक सायकलस्वार सारखा ठिकठिकाणी थांबून लांबून आमचे निरीक्षण करत होता. त्याला झुकांडी देऊन निसटण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने आमच्या वर झडप घातली, ' कारे काय करताय रे केव्हा पासून पाहतोय, कोण रे तुम्ही ? शिव्यांची लाखोली सुरू...

एका हातात सायकल चे हॅंडल आणि दुस-या हाताने आमच्या शर्टाची काॅलर पकडून त्याने आम्हाला हल्ली च्या बळीराम पेठेतील संघ कार्यालया जवळ च्या तत्कालीन काट्याफैल पोलिस चौकी त आणले. तीथल्या दोन पोलिसांनी सायकल वर बसवून, आम्हाला शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस स्टेशन पाहूनच हातपाय गळाले. आम्ही भोकाड पसरले ! आम्हाला ज्याने पकडले होते त्या रमेश नावाच्या साध्या वेशातील पोलिसाने ड्युटीवरील पीएसआय सोनार यांना सर्व प्रकार कथन केला. आम्ही थंडी ने कुडकुडत होतो. मोठ्ठ्या डोळ्यांच्या रागीट दिसणा-या सोनार साहेबांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले. कुठे राहता, काय करतात, कोणत्या शाळेत शिकतात, आणि महत्त्वाचा प्रश्न - तुम्हाला हे कुणी करायला सांगितले ? आम्हाला नाव सांगा, मग तुम्हाला सोडून देऊ. 

' आम्हाला आमचे मुख्य शिक्षक घन:श्याम जोशी यांनी असे लिहायला सांगितले ' मी उत्तर देऊन मोकळा झालो !

झाले. पोलिस लगेचच घन:श्याम जोशींच्या तहसील कचेरी जवळ असलेल्या घरी गेले. तोपर्यंत ते फरार झाले होते. 

बळीराम पेठेत सगळीकडे पोलिस बंदोबस्त वाढला होता. आमच्या घरा समोर साध्य वेशातील पोलिस उभे होते. वडील रेल्वेत गार्ड च्या नोकरीला असल्याने ते ड्युटी वर गेले होते. घरात ऐंशी वर्षे वयाची पॅरॅलिसीस झालेली आजी, परावलंबी असलेले माझे काका, माझी आई आणि माझ्या पेक्षा लहान असलेल्या दोन बहिणी. बरीच रात्र झाल्याने अस्वस्थ होऊन सारे माझी वाट पाहत होते. तितक्यात पोलीसांनी दार वाजवले. समोर पोलिस पाहून आई फार घाबरली. तुमच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे तुम्ही चला पोलिस स्टेशन ला. मग माझी आई आणि राजू साठे ची आई अशा दोघी एकमेकींच्या सोबतीने पोलिस स्टेशन ला आल्या. आई ला पाहाताच मी रडायला सुरुवात केली. पोलिसांची जुजबी प्रश्नोत्तरे झाली. घरुन आमचं अंथरुण पांघरुण मागवून पोलिस स्टेशन च्या हाॅल मध्येच आम्हाला झोपायला सांगितले. झोप तर उडाली होती. 

सकाळी पी आय निंबाळकर साहेब आले. गुन्हा दाखल करण्यात आला. आम्हाला पोलिस जीप मध्ये बसवून ज्या ज्या ठिकाणी आम्ही भिंतीवर घोषणा लिहिल्या होत्या तेथे तेथे नेउन पंचनामा करण्यात आला. पोलिस गाडी, पोलिसांच्या गराड्यात आम्ही दोघे , फोटो ग्राफर - हा काय प्रकार चाललाय हे पाहायला ठिकठिकाणी मोठी गर्दी.

पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आमची वरात पोहोचली. तीथे पोलिस कोठडी मधून कुणी तरी आम्हाला हाका मारल्या. पाहातो तर बळीराम पेठेतील ॲड. राजू दिक्षित. आदल्या दिवशीच त्यांनी रस्त्यावर येऊन घोषणा दिल्या मुळे ते ही अटकेत होते. मात्र ते १८ वर्षांवरील असल्याने पोलिस कोठडी मध्ये होते. आम्ही अल्पवयीन असल्याने कोठडीत ठेवले नव्हते.

दुपारी ३ वाजता आम्हाला कोर्टात नेण्यात आले. आता च्या गुजरात स्वीट मार्ट च्या समोरच्या जागेत तेव्हा जळगाव चे छोटे कोर्ट होते.

श्री. सापत्नेकर जज साहेबांच्या समोर आमची पेशी झाली.

सरकारी वकील श्री काझी यांनी कोर्टात सांगितले की, या मुलांनी केलेले कृत्य हे एक षडयंत्र आहे. म्हणून तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. ती मान्य करून आम्ही १८ वर्षाच्या आतील बाल गुन्हेगार असल्याने आम्हाला बाल सुधारगृहात ( रिमांड होम ) मध्ये ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले.

मला आठवतंय, कोर्टात आम्हाला भेटायला, धीर द्यायला जनसंघाचे शिवाजीनगर मधील कार्यकर्ते स्व. दत्तोपंत पाटील आले होते !

त्या नंतर पोलिस आम्हाला रिमांड होम मध्ये घेऊन गेले. तिथले सोपस्कार पार पाडले. 

     (अभिमन्यू सायं शाखेचे सत्याग्रही स्वयंसेवक - उदय भालेराव, घन:शाम जोशी, रघुपती साठे आणि सतिश मदाने)

आता दुपार चे चार वाजले होते. त्या ठिकाणी आमची भेट बळीराम पेठेतील आमच्या शाखेचे स्वयंसेवक श्री. सतिश मदाने आणि श्री. संजय कुलकर्णी यांच्या शी झाली. ते दोघे आमच्या पेक्षा वयाने थोडे मोठे असले तरी १८ वर्षांच्या आत असल्याने त्यांना सुध्दा रिमांड होम मध्येच ठेवले होते. त्या दोघांना तीथे पाहून मला खूप आनंद झाला, हायसे वाटले. तेही सत्त्याग्रह केल्या मुळे त्या ठिकाणी होते. चला कुणी तरी आपल्या ओळखीचे इथे आहेत तर !

संध्याकाळी ६ वाजता शिटी वाजली. रिमांड होम मधील सगळी मुले ग्राउंड मध्ये गोळा झाली. सतीश मदानेंनी रिमांड होम मधील सगळ्या बालगुन्हेगार मुलांकडून गणपती स्तोत्र आणि काही प्रार्थना म्हणून घेतल्या. तिथल्या मुक्कामात त्यांचा तो रोज चा दिनक्रम होता.

रात्री माझ्या वडिलांचे रेल्वेतील सहकारी आणि जीवाभावाचे स्नेही श्री. इनामदार काका हे माझ्यासाठी घरचे जेवण घेऊन आले. कोर्टाने आम्हाला घरचे जेवण घ्यायला परवानगी दिली होती.रिमांड होम पासून इनामदार काकांचे घर जवळ असल्याने दररोज सकाळी व संध्याकाळी काका आणि ते ड्युटी वर गेले असतील तर इनामदार काकू ( त्या सुध्दा शासकीय सेवेत होत्या ) चहा-नास्ता, जेवण घेऊन येत. दरम्यान भालेराव आणि साठे या बळीराम पेठेतील दोन लहान मुलांना पोलिसांनी पकडले आहे ही बातमी वृत्तपत्रात छापून आली नसली तरी, गावभर पसरली होती. पण आमच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला तर पोलिस त्रास देतील या भिती ने आमचे शेजारी पाजारी, गावातील परिचयाचे लोक, नातेवाईक सुध्दा त्या काळात ढुंकूनही पाहत नव्हते, अपवाद केवळ इनामदार कुटुंबीयांचा !

आम्ही रिमांड होम मध्ये असताना पोलिसांनी माझ्या वडिलांना अनेक वेळा पोलिस स्टेशन ला चौकशी साठी बोलावून घेतले. मुलांवर बारीक लक्ष ठेवा अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. त्या काळात संपूर्ण कुटुंबाला खूप मनस्ताप झाला. वडिलांची नौकरी जाते की काय अशी परिस्थिती होती. सगळीकडे मोठी दहशत होती.

१० दिवसांनंतर कोर्टाने आम्हाला दोघांना, आमच्या वडिलांनी आमच्या वतीने दिलेल्या चांगल्या वर्तणूकीच्या वैयक्तिक बाॅंडवर व एका प्रतिष्ठित व्यक्ती ने दिलेल्या जामिनावर मुक्त केले. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत जळगावातील निष्णात फौजदारी वकील आणि माझ्या वडिलांचे बालपणा पासून चे जिवाभावाचे मित्र स्व.ॲड. अच्युतराव ऊर्फ बाबासाहेब अत्रे यांनी मोलाची मदत केली. त्या सार्वत्रिक दहशतीच्या छायेत सुध्दा ॲड. अत्रे बाबा यांनी अत्यंत निर्भयपणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच सत्याग्रहींचे न्यायालयीन खटले चालवले, ते ही विनामोबदला ! स्व. बाबा माझ्या बद्दल सांगताना अभिमानाने म्हणायचे, " हा माझा सगळ्यात लहान वयाचा पक्षकार बरं का. "

सुटके नंतर आम्ही घरी आलो. आता वडील नक्की झोडुन काढणार असे वाटत असतानाच त्यांनी मायेने जवळ घेऊन डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला अन् म्हणाले, " घाबरु नकोस . खूप खूप मोठा हो ".

वडिलांचे ते शब्द माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत. अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती आणि बळ वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी मला माझ्या वडिलांच्या त्या शब्दानी प्राप्त झाले !

पुढे आणिबाणी संपेपर्यंत दोन, तीन वेळा पोलिसांनी मला आणि साठे ला जळगावातील अन्य सत्त्याग्रहीं सोबत २४ तासांसाठी अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. 

 कधी आणिबाणीच्या पहिल्या वर्धापन दिना चे निमित्त तर कधी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जळगावात येणार म्हणून ! यावेळी संघटना काॅंग्रेस, प्रजासमाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष तसेच जनसंघाचे स्थानिक नेते यांना पोलीस अटक करून कधी पोलीस मल्टीपर्पज हाॅल मध्ये तर कधी पोलीस मुख्यालयात २४ तासांसाठी डिटेन करून ठेवत. यात वयोवृद्ध नेते स्व. भैय्यासाहेब देवकीनंदन , स्व शांतीलालजी रायसोनी, स्व. ॲड नंदलाल दहाड, स्व. नथमल जांगडा , स्व. प्रा. श्यामकांत कुळकर्णी आदी सर्व पक्षीय विरोधी नेते असत. आमच्या परिचयाचे ॲड श्रीकांत भुसारी, श्री गजानन पन्नालाल जोशी, ॲड राजू दिक्षित, श्री देवेश कासखेडीकर आदी मंडळी २४ तास सोबत असत. 

आज ४७ वर्षांनंतर मागे वळून पाहताना - अगदी लहान वयातील या सत्त्याग्रहाने माझ्या जिवनात एक वेगळेच स्थित्यंतर घडवून आणल्याची भावना आहे. अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचे आणि आपल्या मातृभूमीला परंवैभवाप्रत नेण्यासाठी कटीबद्ध होण्याचे बाळकडू त्यातूनच मिळाले हे मात्र नक्की !

भारत माता की जय


उदय नारायण भालेराव.

No comments:

Post a Comment

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...