Friday, September 16, 2022

भाजपा ची धर्मशाळा होऊ नये

                   


१९५२ साली या देशात  जनसंघ या प्रखर राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाच्या मिणमिणत्या दिव्याची ज्योत प्रज्वलीत झाली होती.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटलजी, अडवाणी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत , अनेक हाल अपेष्टा सोसत जनसंघाच्या दिव्याची ती ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली !
कालांतराने १९८० साली जनसंघाच्या तळपत्या दिव्याच्या ज्योतीतून भारतीय जनता पार्टी च्या कमलपुष्पा चा उदय झाला.  तत्कालीन जनसंघाच्या किंवा आता च्या भारतीय जनता पार्टी ची विचारसरणी मानणारी व्यक्ती कधीकाळी या देशाच्या राष्ट्रपती पदावर, पंतप्रधान पदावर विराजमान होईल अशी दूर दूर पर्यंत शक्यता वाटत नसताना च्या,  त्या काळात असंख्य कार्यकर्त्यांनी घरच्या भाकरी खाऊन प्रसंगी प्रत्यक्ष दगड-शेण अंगावर झेलत, वेळोवेळी तुरुंगवास पत्करत तर स्वर्गिय.पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि आमच्या जळगाव जिल्ह्यातील स्वर्गिय बापू वाणी यांच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी या विचारसरणी साठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. राजकीय सत्ता मिळवणे आणि मिळालेली सत्ता उपभोगणे हे ध्येय या मंडळींचे कधीच नव्हते. या सर्व आठवणी माझ्या सारख्या सामान्य जुन्या कार्यकर्त्यांना अभिमानास्पद अशाच आहेत.
आज भारतीय जनता पार्टी चा चहूकडे विस्तार झालेला दिसतो आहे.  सर्व समाज घटकांचे नवनवीन कार्यकर्ते - नेते जोडत जोडत पक्षाचा विस्तार होत असतो.  नवीन जोडला जाणारा प्रत्येकच  कार्यकर्ता हा काही तुमच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊनच आलेला असेल असे नाही. यातील अनेक जण हौसे, नवशे आणि गवशे या संज्ञेचे असणार! सत्ता हाच ज्यांचा श्वास आहे , मिळालेल्या सत्तेतून गडगंज पैसा कमावणे हेच ज्यांचे ध्येय आहे अशा मंडळींचा सत्ता जाताच  जीव कासावीस होतो. अशा सत्तेच्या आस-याने जगणा-या स्वार्थी मंडळींना मग राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टी मध्ये सामील व्हावे असे वाटू लागले तर नवल नाही ! आणि मग एका रात्रीतून आपला पक्ष सोडून भाजपा मध्ये प्रवेश करणा-यांची रांग लागते...
काही वेळा राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून भाजपा चे वरीष्ठ नेते अन्य पक्षातील मातब्बर मंडळींना आपल्या पक्षात दाखल करून घेतात. या नव्याने आलेल्या मंडळींना निवडणूकीचे तिकीटही दिले जाते. ते भाजपा चे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. यातील काहींना मंत्रीपदाची लाॅटरी सुध्दा लागते. अर्थात हा त्या त्या वेळचा राजकीय अपरिहार्यतेचा भाग असू शकतो. पक्ष विस्तारासाठी असे मार्ग पक्षनेतृत्वाकडून अवलंबले जातात. अर्थात या बद्दल फारशी तक्रार असण्याचे कारण नाही.
पण भाजपा ची सत्ता जाताच यातील हौशे- गौशै भाजपा ची सोबत सोडून सत्तेच्या वळचणीला  गेल्याची उदाहरणे आहेत.
गोवा या छोट्याशा राज्यात नुकतेच काॅंग्रेस मधून ८ आमदारांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. यात दिगंबर कामत या माजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती चा देखील समावेश आहे. गंमतीचा ( ?) भाग म्हणूजे हेच मुळचे काॅंग्रेसी असलेले दिगंबर कामत मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात भाजपा चे मंत्री होते. मधल्या काळात त्यांना भारतीय जनता पार्टी ची कोणती ध्येय धोरणे पटली नाहीत कोण जाणे पण त्यांनी भाजपा सोडून काॅंग्रेस मध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत ते काॅंग्रेस चे आमदार म्हणून निवडून ही आले. वर्ष/दोन वर्षांत त्यांना काॅंग्रेस चा कंटाळा आला आणि आता पुन्हा एकदा कामत  आपल्या ७ सहकारी आमदारांच्या सोबती ने भाजपा च्या  हवेली मध्ये  मुक्कामी आले आहेत  ! ११ पैकी चक्क ८ आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याची अडचण नाही.  बरं आता हे दिगंबर कामतांच्या सोबत भाजपा मध्ये प्रवेश केलेले ८ आमदार किती दिवस, किती महिने वा किती वर्षे भाजपा च्या हवेली मध्ये मुक्काम करतात हे पाहणे औत्सुक्य पुर्ण असणार आहे !
अर्थात नेहमीच अस्थिर राजकीय वातावरण असणा-या गोव्यातील या सर्व जोड-तोडी  चा भविष्यात भाजपा ला दीर्घकालीन लाभ होऊ शकतो हे लक्षात घेऊनच भाजपा नेतृत्वाने या  आयारामांना पक्षात प्रवेश दिला असेल असे मानण्यास जागा आहे.
गोव्याचे जाउद्या पण जळगावात तरी वेगळे काय चाललंय  ? चार वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, जगातल्या कुठल्याही राजकीय विचारसरणी शी बांधीलकी नसणा-या लोकांच्या झुंडीच्या झुंडी भाजपा च्या टुमदार हवेली मध्ये डेरे दाखल झाल्या.  कारण त्या वेळी केंद्रा प्रमाणेच राज्यात सुध्दा भाजपा ची सत्ता होती.  राज्यात सत्ता पालट होताच या स्वार्थी  झुंडी भाजपा तून बाहेर पडून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला पोहोचल्या.  आता दोन महिन्यांपूर्वी राज्यात भाजप सत्तेवर आल्याबरोबर या स्वार्थी सत्तालोभी मंडळींनी पुन्हा एकदा नामदार श्री गिरीशभाउ यांच्या भोवती रुंजी घालण्यास सुरुवात केली आहे.
या मंडळींना भाजपा म्हणजे   धर्मशाळा वाटते आहे की काय ?
अर्थात भाजपा च्या टुमदार हवेली ची  धर्मशाळा होऊ द्यायची की नाही याचा निर्णय भाजपा च्या नेतृत्वाने घ्यायचा   आहे ! या मातृभुमीला परंवैभवाप्रत   नेण्यासाठी कटीबद्ध असलेल्या सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपा च्या टुमदार हवेली ची अशा रीतीने धर्मशाळा झालेली कसे मान्य  होईल  ?

उदय भालेराव, जळगाव
७८७५५५८१५०

3 comments:

  1. उदयराव आपली कळकळ समजु शकतो मात्र सत्तेचे गणित बेरजेचे कि वजाबाकीचे हे ठरविणारे आपण कोण ? सत्ता चालविणारेच ठरविणार... ज्या गोष्टी सामान्य कार्यकर्त्याला वा नागरीकालाही कळतात त्या धुरीणांना समजु नये याचे नवल वाटते. तत्त्व आणि व्यवहार यांची फारकत झाली की धर्मशाळाच होणार असो. अलिकडे सत्तेसाठीच सर्व काही त्यामुळे आपण फक्त जे जे होईल ते ते पहावे एवढेच आपल्या हाती नाही का ?

    ReplyDelete
  2. कॅडर टू मास अँड मास टू कॅडर यातील आपली भूमिका आपण ठरवायची आणि "इदं न मम" म्हणून कार्यरत राहावं हेच उत्तम आणि अंतिम तथ्य. 🙏

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...